रत्नागिरी
चिपळूण । प्रतिनिधी ।
संपूर्ण देशात काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाला एक पर्याय म्हणून उभा राहत आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राज्यातही काँग्रेस सक्षम होत आहे. याच पार्श्वभूमिवर चिपळूण नगरपरिषदेच्या सर्व जागा आम्ही स्वबळावर लढवणार असल्याचे माजी खासदार हुसेनभाई दलवाई यांनी सांगितले.
चिपळूण शासकीय विश्रामगृहात गुरूवारी सायंकाळी शहरातील प्रमुख पदाधिकार्यांची बैठक झाली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव इब्राहीम दलवाई, प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव सोनललक्ष्मी घाग, तालुकाध्यक्ष प्रशांत यादव,भरत लब्धे, संजयशेठ रेडीज, सुरेश पाथरे,लियाकत शाह, राकेश दाते, दीपक निवाते, यशवंत फके, दिलावर फकीर आदी प्रमुख पदाधिकारी तसेच उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे,कबिर काद्री, करामत मिठागरी, संजिवनी शिगवण, सफा गोठे उपस्थित होते.
या बैठकीत नगरपरिषद निवडणुकीवर विशेष चर्चा झाली. सध्या पक्षाचे पाच नगरसेवक आहेत शिवाय अपक्ष व इतर चार नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत त्यामुळे सर्व जागा स्वबळावर लढल्यास पक्षाचा फायदा होईल. यावर एकमत होऊन माजी खासदार दलवाई यांच्या नेतृत्वाखाली सर्व जागा लढण्याचे ठरले. प्रदेश सचिव दलवाई व जिल्हाध्यक्ष अँड. विजयराव भोसले हे लक्ष ठेवतील. सर्व प्रभागात बैठका घेऊन जेथे बुथ कमिट्या नाहीत तेथे 10 ते 15 दिवसात नवीन पदाधिकारी नियुक्त करण्यात येतील. नगरपरिषद निवडणुकीसाठी वलकरच सुकाणू समिती गठीत करण्यात येईल. मा.खा. दलवाई दर 15 दिवसांनी सर्व आढावा घेणार आहेत. या बैठकीमुळे शहरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला आहे.