रायगड
बीड, प्रतिनिधी
बीड शहरात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शेतकरी बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकापचे भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा धडकला.
यावेळी शेकाप दलित भटक्या मुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. राजेश ढवळे यांनी केंद्र सरकार आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. यावेळी अॅड. अविनाशराव देशमुख, अॅड. नारायण गोले पाटील यांची भाषणे झाली, तर भाई मोहन गुंड यांनी शेतकर्यांना वेठीस धरलं तर कायदा हातात घेऊ असा इशारा दिला. बीड शहरत बैलगाडी मोर्चा हा बीडकरांसाठी आकर्षक ठरलं.
दिल्ली येथे चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ तीन कृषी कायदे रद्द करावेत, सक्तीची वीज बिल वसुली थांबून मागील वर्षाचे शेतीपंपाची वीज बिल माफ करावे, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ तात्काळ थांबवावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, 2020 बीटी कापसाचे बोगस बियाणे देणार्या कंपन्यांवर कारवाई करून शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी, बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकर्यांना एफआरपीप्रमाणे 14 दिवसाच्या आत ऊस बिल द्यावे, वयाच्या 60 वर्षांनंतर शेतकर्यांना 10 हजार रुपये दर महिना पेन्शन घ्यावी, या मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले मोर्चाला माकपचे मोहन जाधव, बहुजन रयत परिषदेचे रमेश तात्या गालफाडे, काँग्रेसचे नागेश मिठे पाटील, सामाजिक कार्यकर्त्या किस्किंदा पंचखळ, संभाजी ब्रिगेडचे गणेश मस्के यांनी यावेळी पाठिंब्याचे पत्र दिले. मोर्चाच्या वेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी भाई अॅड. संग्राम तुपे, भाई भीमराव कुटे, भाई अर्जुन सोनवणे, भाई दत्ता प्रभाळे, भाई अशोक रोडे, भाई लहु सोळंके, भाई सुग्रीव लाखे, भाई शेख वजीर, अशोक रोडे, अनिल कदम, सर्व जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकर्यांच्या प्रश्नाचा जाणीवपूर्वक विचार न केल्यास निवेदनात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.