रायगड
नेरळ । वार्ताहर ।
राजमाता जिजाऊ फाऊंडेशनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या निबंध स्पर्धेत पहिला गट पाचवी ते आठवी गटासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन कार्य हा विषय ठेवण्यात आला होता. तर नववी ते बारावी गटासाठी छत्रपती शिवाजी यांचे कार्य कर्तुत्व आणि आजची भारतीय संसद प्रणाली तर खुल्या गटात छत्रपती शिवाजी महाराज यांची कार्य प्रणाली आणि महिला अत्याचार एक जागतिक समस्या हा विषय ठेवण्यात आला होता.
तीन गटांमध्ये रायगड जिल्ह्यातील 550 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण सोहळा विश्वनगर येथे असलेल्या श्री स्वामी समर्थ मठ येथे आयोजित केला होता. राजमाता जिजाऊ फाऊंडेशनच्या अध्यक्ष पूजा सुर्वे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी मृदुला गडनीस यांची विशेष उपस्थित होती.
यावेळी त्यांनी बालसंस्कार या विषयावर मार्गदर्शन केले.तर प्रेमनाथ गोसावी यांनी शिवचरित्र या विषयावर व्याख्यान दिले. शिवसेना उपतालुका प्रमुख अॅड. प्रदीप सुर्वे, माजी नगराध्यक्ष रजनी गायकवाड, नगरसेविका पुष्पा दगडे, सुवर्णा निलधे, मधुरा चंदन, भारती पालकर, रघुनाथ निगुडकर, उर्मिला दरेकर, कल्पना दरेकर यांची उपस्थिती होती.
निबंध स्पर्धेत पहिल्या गटात प्रथम क्रमांक आर्या विजय झुंजारराव, द्वितीय क्रमांक उर्मिला शरद कालेकर, तृतीय क्रमांक कीर्ति शंकर वेहले यांनी मिळविला. तसेच दुसर्या गटात 9 ते 12 प्रथम क्रमांक पूर्वा अगज, द्वितीय क्रमांक साहिल बोराडे, तृतीय क्रमांक तन्वी दरेकर यांनी मिळविला. खुल्या गटात प्रथम क्रमांक लालचंद कोळी, द्वितीय क्रमांक सलोनी दळवी, तृतीय क्रमांक एकनाथ चव्हाण, अतुल साठे-देशमुख यांना विभागून देण्यात आले.