रायगड
। पेण । वार्ताहर ।
बलात्कार झालेल्या बालिका, मुली या पीडित नूसन, त्या निर्भया आहेत. किंबहुना त्यांना मुक्तपणे समाजात वावरता यावे, म्हणून महिला अत्याचारविरोधी मंचाच्या सदस्यांनी एक अभिनव जनजागरण मोहीम हाती घेतली. त्या अभियानाचा शेवट मकर संक्रांतीच्या दिवशी पीडित मुली प्रतिकात्मक कृती म्हणून मुक्तपणे आकाशात भरारी घेणारे पतंग उडवून करणार आहेत.
गेल्या दहा महिन्यांपासून कोरोनाचे संकट, बिघडलेली अर्थव्यवस्था, कौटुंबिक हिंसाचराच्या वाढलेल्या केसेस. त्यामध्ये नुकतीच पेणमधील आदिवसी बालिकेवरील बलात्काराची व खुनाची घटना याने समाजमन ढवळून निघाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दिल्लीच्या कुप्रसिद्ध निर्भया प्रकरणानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महिला अत्याचारविरोधी मंचाच्या सदस्यांनी समाज प्रबोधनाकरिता एक अभिनव जनजागरण मोहीम हाती घेतली आहे. या अभियानाचा शेवट समाजातील पीडित मुली आज प्रतिकात्मक कृती म्हणून मुक्तपणे आकाशात भरारी घेणारे पतंग उडवून करणार आहेत.
गुरुवारी मकर संक्रांतीला सायंकाळी तीन वाजताच्या सुमारास रायगडच्या पालकमंत्री, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे, जिल्हा परिषदेच्या सभापती निलिमा पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील व सर्व महिला अधिकारी तहसीलदार, न.पा. सीईओ, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग या मुलींच्या आनंदात प्रतिकात्मक सामील होणार आहे. समस्त पेणकर या क्षणाची वाट बघत आहेत.तामिळनाडूमध्ये पोंगल, पंजाबमध्ये लहोरी म्हणून ओळखल्या जाणार्या या सणाला महाराष्ट्रात महत्त्वाचे स्थान आहे. संक्रांतीचे महत्त्व व पुराणातील कथेप्रमाणे फार वर्षांपूर्वी संकारसुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पिडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्या दिवशी उत्तरायणाला प्रारंभ होतो.याचा संदर्भ देऊन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील म्हणाल्या, बलात्कार झालेल्या बालिका, मुली या पीडित नसून, त्या निर्भया आहेत, किंबहुना म्हणूनच आम्ही त्यांना मुक्तपणे समाजात वावरता यावे म्हणून हे अभियान राबविण्याचे ठरवले. या अभियानात शक्ती विधेयकावर गटचर्चा, एकल महिलांकरिता पेन्शन योजना आदी उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये ज्योती राजे, कविता पाटील, नीता कदम, शैला धामणकर, मधुबाला निकम आदी उपस्थित होत्या.