| ठाणे | वृत्तसंस्था |
राज्यातील अपघाताच्या घटनांची मालिका सुरूच आहे. आता, भिवंडी वाडा रोडवर भीषण अपघात झाला असून सदर अपघातात दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे. अपघातीची माहिती मिळताच स्थानिकांनी व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस प्रशासनानेही घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून आरोपी कारचालकास ताब्यात घेतलं आहे.
भिवंडीहून अंबाडीकडे भरधाव वेगाने येणारी वॅगनार कार (एमएच 04केडब्ल्यू1746) दुगाड फाटा येथे येताच गाडीला अपघात झाला. येथील रस्त्यावर अगोदर कारने एका महिलेला जोरदार धडक दिली. अपघाताच्या भीतीने कार ड्रायव्हरने आपली कार भरधाव वेगाने अंबाडीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अगोदरच अपघात झाल्याने मनात दडपण असलेल्या कारचालकाने येथेही नियंत्रण सुटले. त्यामुळे वारेट गावच्या हद्दीत कारने लग्न समारंभासाठी जात असलेल्या दोन सख्ख्या भावांना भरधाव वेगात धडक दिली. या भीषण अपघातात पंढरीनाथ पाटील व गुरुनाथ पाटील या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. अपघातात मृत पावलेले दोन्ही इसम भिवंडी तालुक्यातील चिंचवली खांडपा या गावचे रहिवासी आहेत. याप्रकरणी पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.