मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अनोखा उपक्रम
| अलिबाग | प्रमोद जाधव ।
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अलिबागमधील काही हॉटेल व्यवसायिकांनी एक आगळा वेगळा उपक्रम घेतला आहे.मतदान करा आणि तीन दिवस दहा टक्के सवलतीच्या दरात भोजन करा असा उपक्रम हाती घेतला आहे.
रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी गावागावात जनजागृती करण्याच्या सुचना जिल्ह्यातील विविध विभागाला दिल्या. त्यानुसार जिल्ह्यातील तलाठ्यांपासून उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वच यंत्रणा कामाला लागली. महसूल, पोलीस आरोग्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, शिक्षण विभाग अशा अनेक यंत्रणांमार्फत ग्रामीण व शहरी भागात जाऊन मतदानाचे महत्व पटवून देण्याचे काम सुरु केले. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामध्ये अलिबागमधील हॉटेल व्यवसायिकांनीदेखील पुढाकार घेतल्याचे समोर आले आहे.
अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील व नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील हॉटेल व्यवसायिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले. मतदानाचा टक्का वाढण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत काही हॉटेल व्यवसायिकांनी मतदान करणाऱ्यांना सवलतीच्या दरात भोजन देण्याचा निर्णय घेतला. येत्या 7 मे रोजी मतदान असणार आहे. त्यामुळे सात ते नऊ मे या कालावधीत तीन दिवस मतदान करणाऱ्यांना दहा टक्के सवलतीच्या दरात भोजन दिले जाणार असल्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळणार असल्याचा विश्वास हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केला.